योगेश काशीद, साम टीव्ही
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदी पात्रात तब्बल 100 कोटी रुपयांचे अवैध वाळू उत्खनन गेवराई तहसीलदाराच्या माध्यमातून एका सिंडिकेटकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केला आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून ETS सर्वे करण्यात यावा, तसेच संपूर्ण अवैध उत्खननाची जबाबदारी गेवराई तहसीलदारांवर निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आमदार पंडित यांनी सांगितले की, या संदर्भात ते महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार दाखल करणार असून, येणाऱ्या अधिवेशनातही हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात येणार आहे. अवैध वाळू उत्खननाबाबतचे पुरावे स्वतःकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे गेवराईचे तहसीलदार पोलीस मिळून सिंडीकेट चालवत आहेत. कारटेल करून अवैध वाळू उत्खनन करत असल्याचाही आरोप केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर व हायवा हे काही पोलीस अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप आमदार पंडित यांनी केला. या वाहनांवर नंबर प्लेट नसून, विनानंबरची ही वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अनेक अपघात घडले आहेत, असे त्यांनी म्हटले. जीपीएस मोटारसायकलला बसवून ती एका दिशेने पाठवली जाते, तर प्रत्यक्ष टिप्पर मात्र दुसऱ्याच मार्गाने वाळू घेऊन जातात, असा दावाही त्यांनी केला.
जिल्ह्यातील 1,600 घरकुलांना प्रत्येकी 5 ब्रास वाळू देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाच्या नावाखाली गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे अंदाजे 8,000 ब्रासऐवजी तब्बल 80,000 ब्रास वाळूचे उत्खनन गेवराई तहसीलदारांनी स्वतः उपस्थित राहून करून घेतल्याचा आरोप आमदार पंडित यांनी केला आहे.
श्रीक्षेत्र राक्षसभुवन हे शनिच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले मंदिर, तसेच स्मशानभूमी आणि दशक्रिया विधी घाट परिसरालाही धक्का पोहोचेल अशा पद्धतीने अवैध वाळू उत्खनन करण्यात आल्याचा दावा आमदार पंडित यांनी केला आहे. या उत्खननामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
अवैध वाळू उत्खननात सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असला, तरी त्यांच्यावरही समान निकषांनुसार कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम मागणी आमदार पंडित यांनी केली. तहसीलदारांना लोकप्रतिनिधी म्हणून वेळोवेळी चुकीच्या गोष्टी करू नका, असा सूचना दिला होत्या. मात्र “मी काही करत नाही” असे खोटे उत्तर देत त्यांनी दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. तहसीलदारांचा ‘मुजरूपणा’ वाढलेला असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासनासह काही जणांनी सिंडिकेट व कार्टेल तयार करून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू केल्याचा आरोप आमदार पंडित यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.