बारामतीमध्ये लाखो नागरिक आपले लाडके नेते ‘अजितदादा’ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले असताना, याच शोकाकुल वातावरणाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डल्ला टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराच्या गर्दीत तब्बल १५ नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या.
२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित दादांच्या अंतिम दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक बारामतीत दाखल झाले होते. संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती.
१५ जणांच्या गळ्यातील साखळ्या लंपास
या प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने नागरिकांना लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५ नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या आहेत. चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही संशयित चोरट्यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले, तर काही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
८ हजार पोलीस तैनात असूनही चोरी
विशेष म्हणजे, त्या दिवशी बारामती शहरात सुमारे ८ हजार पोलीस कर्मचारी तैनात होते. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोहम्मद युनूस, राजकुमार आठवले, एजाज मिरावले, मोहम्मद सिराज, बाळू बोत्रे यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
बारामतीकरांमध्ये संताप
सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. एकीकडे अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी वातावरण अत्यंत भावनिक होते, तर दुसरीकडे चोरटे नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरण्यात व्यस्त होते. या घटनेमुळे बारामती शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.