पावसाळ्यामध्ये शरीरातून पाणी तसेच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स नकळत कमी होऊ शकतात. मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत या काळात घाम कमी येत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे किंवा आर्द्रतेचा (Humidity) परिणाम होत आहे, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही.
शरीरातील द्रवपातळी संतुलित ठेवण्याबरोबरच स्नायू आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पावसाळ्यात तहान कमी जाणवत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे अनेकदा जाणवत नाही. डॉ. दिव्या गोपाळ, ऍडिशनल डायरेक्टर, इंटरनल मेडिसिन, Sir H.N. Reliance Foundation Hospital यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा वेळी फक्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघेलच असे नाही. त्यामुळे थकवा, स्नायूंमध्ये आकडी येणे, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा तहान लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे वातावरणात अधिक उष्णता असताना किंवा जास्त घाम येत असताना शरीराचे हायड्रेशन योग्य ठेवण्यासाठी केवळ पाणी पिणे पुरेसे ठरणार नाही. पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट्सचीही पूर्तता करणे आवश्यक ठरू शकते. यासाठी ओआरएस (ORS), थोडे मीठ घातलेले लिंबूपाणी, नारळपाणी, ताक तसेच संतुलित आहार यांचा आहारात समावेश करता येतो.
जेव्हा शरीराला केवळ पाण्याऐवजी इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता असते, तेव्हा काही ठराविक संकेत मिळू शकतात. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही सतत तहान जाणवत राहणे हे त्यापैकी एक महत्त्वाचे लक्षण आहे. शरीरातील द्रवपातळी संतुलित ठेवण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचीही गरज असते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानंतरही तहान लागणे, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोट भरल्याची भावना कायम राहणे अशा समस्या होऊ शकतात.
इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे स्नायूंमध्ये आकडी येणे, स्नायू आकसणे किंवा स्नायूंमध्ये अनैच्छिक हालचाली होणे. ही समस्या प्रामुख्याने पोटरी, पाय आणि पोटाच्या स्नायूंमध्ये जाणवू शकते. स्नायूंचे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स महत्त्वाचे असल्याने त्यांची कमतरता झाल्यास अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा हीदेखील घामामुळे शरीरातील आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची लक्षणे असू शकतात. यासोबत विचार करण्यास अडचण येणे (Brain Fog), चिडचिड, सुस्ती किंवा एकाग्रता कमी होणे यांसारख्या तक्रारीही जाणवू शकतात. ही लक्षणे इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असल्याचे संकेत देऊ शकतात.
चिप्स, लोणचे यांसारखे खारट पदार्थ खाण्याची अचानक इच्छा होणे हे शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढण्याची गरज असल्याचे संकेत असू शकतात. पावसाळ्यात शरीराचे योग्य हायड्रेशन टिकवण्यासाठी पौष्टिक आहारासोबत पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्सचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी ओआरएस, नारळपाणी, ताक किंवा थोडे मीठ घातलेले लिंबूपाणी यांचा आहारात समावेश करता येतो. मात्र, या काळात शरीरातील हायड्रेशनची पातळी योग्य आहे की नाही, याकडे नियमितपणे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.