आजकालची जीवनशैली म्हणजे तासनतास लॅपटॉपसमोर बसून राहणं, चुकीचा आहार आणि अपुरी झोप.... अशातच वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणं आणि पाणी येणं या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. स्क्रीनच्या वापरल्यानंतर होणारी सौम्य जळजळ सामान्य वाटू शकते. मात्र जर तुमच्या डोळ्यांमध्ये वारंवार लालसरपणा, कोरडेपणा किंवा डोळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर ती एक गंभीर समस्या असू शकते.
फरिदाबादच्या अमृता हॉस्पिटलमधील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. रश्मी मित्तल यांनी जागरण वेबसाईटला माहिती देताना डोळ्यांच्या जळजळीमागचं नेमकं कारण काय असू शकतं हे सांगितलंय.
आपल्या डोळ्यांचा पृष्ठभाग अश्रूंच्या पातळ थराने संरक्षित असतो. ज्यामध्ये पाणी, तेल आणि म्यूकसचा समावेश असतो. हा थर डोळे ओलसर ठेवण्यास आणि त्यांना बाह्य इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत करतो. जेव्हा हा थर अस्थिर होतो तेव्हा डोळे थेट हवेच्या संपर्कात येतात ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ होते.
डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. जेव्हा आपण बराच वेळ स्क्रीनकडे टक लावून पाहतो तेव्हा आपल्या पापण्यांची उघडझाप करण्याची गती ५०-६०% ने कमी होते. पापण्यांची उघडझाप कमी झाल्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर सुकतात. परिणामी डोळे कोरडे पडतात आणि जळजळ झाल्यासारखं वाटतं.
डोळ्यांची जळजळ होणं
धुसरं दिसणं
डोळ्यात जास्त पाणी येणं
डोळे सुकणं
लाईट सेंसिव्हीटी
भारतातील शहरी भागांमध्ये वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. हवेतील प्रदूषक, धूर आणि रसायनं यांचा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर थेट परिणाम होतो. प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो.
प्रत्येक २० मिनिटांच्या स्क्रीन टाईमनंतर २० फूट दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे २० सेकंदांसाठी पाहा.
शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका आणि पुरेशी झोप घ्या .
काम करताना जाणीवपूर्वक डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा.