पावसाळा उकाड्यापासून दिलासा देतो खरा, पण याचसोबत अनेक संसर्गजन्य आजारही घेऊन येतो. यापैकी एक गंभीर आणि भारतात अजूनही फारसा ओळखला न गेलेला आजार म्हणजे स्क्रब टायफस. भारतात दरवर्षी सुमारे १० लाख रुग्ण नोंदवले जातात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू होण्याचा धोका देखील असतो.
कोल्हापूरच्या सिटी हॉस्पिटलमधील आयसीयु तज्ज्ञ डॉ. अविनाश उपाध्याय यांनी सांगितलं की, हा आजार ओरिएंटिया त्सुत्सुगामुशी नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू संक्रमित चिगर नावाच्या छोट्या कीटकांच्या चाव्यामुळे मानवामध्ये प्रवेश करतात. भारतात स्क्रब टायफस फार सामान्य असून, बहुतेक रुग्णांमध्ये हा आजार अनेक अंतर्गत अवयवांवर परिणाम करतो. अलीकडील काळात, हा आजार पावसाळ्यात ताप येण्याच्या मुख्य कारणांपैकी एक ठरत आहे आणि त्यामुळं आजारी पडण्याचे प्रमाण तसेच मृत्यू दरही जास्त आहे.
स्क्रब टायफस हा पावसाळ्याशी संबंधित परजीवी आणि माईट्समुळे होणारा संसर्ग आहे. चावल्यावर १०–१२ दिवसांनी याची लक्षणं दिसून येतात. यामध्ये डोकेदुखी, ताप, अंग दुखणे, थंडी वाजणे, लसीका ग्रंथी (लिंफ नोड्स) सुजणं या तक्रारी जाणवतात.
चावलेल्या भागावर सुरुवातीस गुलाबी किंवा लालसर डाग दिसतो. ताप सुरू झाल्यानंतर सुमारे आठवड्याभरात छातीवर गुलाबी पुरळ दिसायला लागतो आणि हळूहळू हात-पायांवर पसरतो. यावर डॉक्सीसायक्लिन हे प्रभावी प्रतिजैविक औषध सुरुवातीलाच दिल्यास परिणामकारक ठरते. स्क्रब टायफसचा धोका अशा भागात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या लोकांना अधिक असतो, जिथे हा आजार सामान्य आहे.
या संसर्गापासून वाचण्यासाठी, त्वचा व कपड्यांवर डीईईटी किंवा चिगर आणि माईट्सवर प्रभावी ठरणारे घटक असलेले कीटकनाशक वापरणे आवश्यक आहे. हे कीटकनाशक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि पॅकमधील सूचनांनुसार वेळोवेळी लावावे.
जर सुर्यकिरणांपासून संरक्षणासाठी सन्स्क्रीन लावत असाल, तर प्रथम सन्स्क्रीन लावावे आणि नंतर कीटकनाशक.
लहान बाळांना पूर्णपणे अंग झाकणारे कपडे घालावेत. त्याच्या डोळ्यांवर, तोंडावर, हातावर किंवा जखमेवर कीटकनाशक लावू नये.
संक्रमण झाल्यास लवकर दिलेली प्रतिजैविके सर्वाधिक परिणामकारक ठरतात. डॉक्सीसायक्लिन लवकर दिल्यास बरे होण्याची शक्यता अधिक असते.
सध्या या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही. उपचारासाठी डॉक्टर रुग्णाच्या स्थितीनुसार अंटीबायोटीक्स देतात. मात्र, दिलेली औषधे पूर्ण कोर्सप्रमाणे घेणं फार महत्तंवाचे आहे. अन्यथा आजार परत उद्भवू शकतो.
रुग्णाने पुरेसा आराम घ्यावा आणि कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान झाल्यास उपचार अधिक चांगले होतात. लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. वेळेत उपचार न झाल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.