TGH Onco Life Cancer Centre येथे आधुनिक प्रगत उपचारांच्या मदतीने ७४ वर्षीय रुग्णाने चौथ्या टप्प्यातील घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात करत आपला गमावलेला आवाज पुन्हा मिळवला आहे. पुणे – पिंपरी-चिंचवड परिसरातील जनार्दन उमाळे यांच्यावर करण्यात आलेल्या प्रिसिजन ऑन्कोलॉजी उपचारांमुळे केवळ कर्करोग नियंत्रणात आला नाही, तर त्यांचे स्वरयंत्रही वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. त्यामुळे ते पुन्हा स्पष्टपणे बोलू लागले असून आत्मविश्वासाने सामान्य आयुष्य जगत आहेत.
रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल आणि युनिट प्रमुख डॉ. संतोष साहू यांनी या उपचारपद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठी क्रांती झाली आहे. योग्य वेळी अचूक निदान आणि नियोजन केल्यास अवयव जतन करत उपचार करणे शक्य होते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
जनार्दन उमाळे यांना सुरुवातीला आवाज बसू लागल्याचे जाणवले. त्याचबरोबर मानेच्या उजव्या बाजूला वेदनारहित गाठ दिसू लागली. सुरुवातीला त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष केले. मात्र तीन महिन्यांत त्यांचा आवाज अधिक कमजोर झाला. मोठ्याने बोलणे कठीण झाले आणि साध्या संभाषणानेही थकवा जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी लोकांशी संवाद टाळण्यास सुरुवात केली आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहू लागले. भीती आणि अस्वस्थता वाढल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सतत आवाज बसणे, गिळताना त्रास होणे आणि मानेवर सूज अशी लक्षणे आढळली. PET-CT तपासणीत उजव्या बाजूच्या पायरिफॉर्म सायनस भागात कर्करोग असल्याचे निदान झाले. ही गाठ स्वरयंत्रापर्यंत पसरली होती तसेच जवळच्या लिम्फ नोड्समध्येही कर्करोगाचा प्रसार झालेला होता. मात्र तो इतर अवयवांपर्यंत पोहोचलेला नव्हता. त्यामुळे अवयव जतन करणाऱ्या उपचारांची योजना आखणे शक्य झाले.
डॉक्टरांच्या टीमने नियोजित रेडिएशन आणि औषधोपचारांच्या साहाय्याने कर्करोगावर नियंत्रण मिळवले. उपचारानंतर रुग्णाचा आवाज हळूहळू सुधारू लागला आणि काही महिन्यांत तो पुन्हा स्पष्ट बोलू लागला. या यशस्वी उपचारामुळे केवळ रुग्णाचे प्राण वाचले नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक जीवनही पुन्हा फुलले आहे. आधुनिक कर्करोग उपचारांमुळे आयुष्य बदलू शकते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.