Sudesh Berry: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुदेश बेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी अपार आदर व्यक्त करत त्यांना भगवान विष्णूंचा अवतार असल्याचे म्हटले. इतकेच नव्हे तर, संधी मिळाल्यास मोदींचे चरण धुवून ते पाणीही पिईन, असे विधान त्यांनी केले.
'अकम्पनी अक्की' (Accompany Akki) या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुदेश बेरी यांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) नावाच्या संघटनेवरही टीका केली. या संघटनेबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत त्यांनी ती देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप केला.बेरी म्हणाले, "मला एजीपी, सीजीपी किंवा अशा कोणत्याही संघटनांची माहिती नाही. मी या लोकांना ओळखतही नाही. मात्र, ते देशाला मागे खेचत आहेत, एवढेच मला दिसते."
जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जर समाजासाठी काही करायचे असेल तर मुलांसाठी उद्याने उभारावीत, वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करावेत किंवा गरजूंच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करावी. केवळ आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही," असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना बेरी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले. "नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती चूक केली आहे? त्यांनी चहा विकला असेल, पण त्याच व्यक्तीने आज जगभर भारताची ओळख निर्माण केली आहे," असे ते म्हणाले. "जर मला मोदीजींना भेटण्याची संधी मिळाली, तर मी त्यांचे चरण धुवून ते पाणी पिईन. मी त्यांना कधीही भेटलो नाही, पण जसा आपण देवाला न पाहताही त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, तसाच माझा त्यांच्यावर विश्वास आणि आदर आहे. यात वाईट काहीच नाही. ते विष्णू अवतार आहे. ते माणूस नाही. मग त्यांना काहीही बोलताना लाज का वाटत नाही? आपण कोणत्या प्रकारचे हिंदू आहोत? असे त्यांनी सांगितले.