पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टपाल विभागाने ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेच्या पात्रतेमध्ये मोठा बदल केला आहे. याआधी RPLI पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराचे ग्रामीण भागात वास्तव्य असणं गरजेचं होतं. मात्र, आता ही अट हटवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात राहण्याच्या नागरिकांनाही या सरकारी जीवन विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
नव्या नियमांनुसार, अर्जदाराकडे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक किंवा कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील अॅक्टीव्ह आणि केवायसी पूर्ण केलेले सेव्हिंग अकाउंट असणे गरजेचे आहे. खाते बंद, फ्रिज, ब्लॉक किंवा इनअॅक्टिव्ह नसावे. फक्त बँक खातं असल्यामुळे विमा आपोआप मिळणार नाही. वय, विमा रक्कम आणि अंडररायटिंगचे विद्यमान नियम लागू राहतील.
RPLI मध्ये १९ ते ५५ वर्षे वयोगटातल्या व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. अधिकृत वयाचा पुरावा नसलेल्या अर्जदारांसाठी ही मर्यादा १९ ते ४५ वर्षे आहे. महिला आणि पुरुष दोघेही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
RPLIची सुरुवात २४ मार्च १९९५ रोजी ग्रामीण नागरिकांना जीवन विमा सुरक्षा देण्यासाठी झाली. या योजनेअंतर्गत ग्राम सुरक्षा, ग्राम संतोष, ग्राम सुविधा, ग्राम प्रिया आणि बाल जीवन विमा अशा विविध पॉलिसी उपलब्ध आहेत. मुलांसाठी जास्तीत जास्त दोन पॉलिसी घेता येतात.
पॉलिसीच्या अटींनुसार तीन वर्षांनंतर सरेंडर व्हॅल्यू आणि लोनची सुविधा मिळू शकते. काही प्रकरणांमध्ये मेडिकल तपासणी आवश्यक असते. ३५ वर्षांपेक्षा जास्त वय किंवा २५,००० रुपयांपेक्षा जास्त विमा रक्कम असेल तर वैद्यकीय तपासणी लागू होऊ शकते. पॉलिसीसाठी जास्तीत जास्त तीन नॉमिनी देता येतात.
दरम्यान, PLI आणि RPLI वेगळ्या योजना आहेत. PLIमध्ये सरकारी, अर्ध-सरकारी कर्मचारी आणि काही विशिष्ट व्यावसायिकांसाठी आहे, तर RPLIची पात्रता आता ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे शहरात राहणाऱ्या पात्र नागरिकांसाठीही RPLIचा पर्याय खुला झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.