केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६००० रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. २३ वा हप्ता जमा झाल्यानंतर आता शेतकरी २४ व्या हप्त्याची वाट पाहतायेत.
अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की, वडील आणि मुलगा दोघांच्या नावावर जमीन असेल तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो का? याबद्दलचे नियम जाणून घेऊयात.
सरकारच्या नियमांनुसार, एका कुटुंबातला फक्त एकाच पात्र सदस्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत नवरा-बायको आणि त्यांची अल्पवयीन मुलं यांना एक कुटुंब मानलं जातं. पण मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याच्या नावावर स्वतंत्रपणे जमिनीची नोंद सात बाऱ्यामध्ये असेल, तर तो स्वतंत्र अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतो.
जर वडील आणि मुलगा यांच्या नावावर संयुक्त जमीन असेल, तर दोघांच्या वाट्याची जमीन स्पष्टपणे नोंदवलेली असणं इथे महत्त्वाचं आहे. तसेच प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र महसूल नोंद किंवा संबंधित कागदपत्रं असणं गरजेचं आहे. फक्त संयुक्त खातं असून कायदेशीर वाटणी झाली नसेल, तर दोघांनाही स्वतंत्र लाभ मिळणार नाही.
सरकारने नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे. चुकीची माहिती देऊन वडील आणि मुलगा दोघेही लाभ घेत असतील तर मिळालेली संपूर्ण रक्कम व्याजासोबत परत करावी लागेल. गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते.
पुढचा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणं, आधार क्रमांक मोबाईलशी लिंक करणं, जमिनीची पडताळणी (Land Seeding) करून घेणं आणि बँक खातं आधारशी लिंक असल्याची खात्री करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.