अक्षय गवळी
अकोला : अगोदरच अतिपावसामुळे पीक हातातून गेले आहे. यामुळे उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तविली जात असून आता पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पाने खाणारी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव आला असल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे आहे.
मागील पंधरवड्यात राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊन पिके देखील पाण्याखाली गेली होती. परिणामी शेतातील पिके सडली आहेत. यानंतर आता पिकांवर रोगराई पसरल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मका व कापूस पिकावर रोग पसरलेला आहे. अकोला जिल्ह्यातल्या अनेक भागात पाने खाणारी अळी आणि शेंगा पोखरणारी अळी अशा विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे.
सोयाबीनच्या प्रत्येक झाडावर ३० ते ४० अळ्यांचा प्रादुर्भाव आहे. अक्षरशः हे अळी सोयाबीन पिकाचे पाने खात आहे आणि लागलेल्या शेंगा पोखरत आहे. दरम्यान, कृषी विभागांना याकडे लक्ष देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. तर अळी नियंत्रणासाठी पीक तणमुक्त ठेवावे, पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडींची आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास फवारणी करावी. निंबोळी अर्क, अझाडिरॅक्टिन आणि बॅसिलस थुरिंजिएन्सिस यांसारख्या जैविक कीटकनाशकांचा वापर करावा; असं आवाहन करण्यात येत आहे.
अति पावसाने मूग, उडदाच्या उत्पादनात ४० टक्के घट
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे या पावसामुळे कापूस आणि मका पिकांना फायदा झाला असला तरी दुसरीकडे सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मूग आणि उडदाच्या वाढीवर परिणाम झाला. आता ऐन काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ही पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. सततच्या पावसामुळे मूग आणि उडदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.