बालाजी सुरवसे/ संदीप भोसले
धाराशिव/ लातूर : फेंगल चक्रीवादळाचा परिणाम राज्यात देखील पाहण्यास मिळाला. मागील आठवड्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर रोगराई पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. तर टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी 59.5 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून जीवापाड जपलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका बसला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात कांदा उत्पादनाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून टाकलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. तर शेतात उभा असलेला कांदा पावसामुळे जागेवरतीच खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
ढगाळ वातावरणाचा टोमॅटो पिकाला फटका
लातूर : मागच्या आठ दिवसापासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकासह टोमॅटो शेतीला मोठा फटका बसला आहे. टोमॅटो पिकाची फुल आणि पान करपण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे बाजारात टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकरी आता दुहेरी अडचणीत सापडला आहे. सध्या बाजारात टोमॅटोला ३०० ते ४०० रूपये प्रति कॅरेट भाव मिळतो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.