

टीम इंडियाने आयसीसी वुमेंस क्रिकेट वर्ल्डकप २०२५ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यावेळी टीम इंडियाच्या महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना ३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. याच मैदानावर २६ ऑक्टोबरला भारत-बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. तसंच भारत-न्यूझीलंड सामन्यातही पावसाचा अडथळा आला होता.
गुरुवारी नवी मुंबईत पावसाची शक्यता ६५ टक्के असल्याचं accuweather.com ने सांगितलंय. गुरुवारी हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे आणि याच वेळेस पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला तरी घाबरण्याचं कारण नाहीये. याचं कारण म्हणजे या सामन्यासाठी आयसीसीने रिझर्व डे ठेवला आहे.
जर ३० ऑक्टोबरला किमान २०-२० ओव्हर्सचा खेळ होऊ शकला नाही तर सामना ३१ ऑक्टोबरला म्हणजेच रिझर्व डेला खेळवला जाणार आहे. यावेळी हा सामना जिथे थांबवण्यात आला होता तिथूनच सुरू करण्यात येईल. जर टॉस झाला असेल, तर तो सामना लाइव्ह मानला जाईल. मात्र ३१ ऑक्टोबरला पावसाची शक्यता ९० टक्के असू जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जर रिझर्व डेवरही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर ऑस्ट्रेलिया टीमला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया लीग स्टेजमध्ये भारतापेक्षा वरच्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाने ७ पैकी ६ सामने जिंकले होते आणि श्रीलंकेविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
टीम इंडियाने आतापर्यंत ३ सामने जिंकले, ३ हरले आणि एक सामना अनिर्णित राहिला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पॉईंट्स टेबलमध्ये चौथं स्थान गाठलं होतं. त्यामुळे सामना रद्द झाल्यास लीग क्रमवारीच्या आधारे ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.