Sarfaraz Khan News In Marathi: लखनऊच्या इकाना स्टेडियमवर इराणी कपचा सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. सुरुवातीचे दोन्ही दिवस मुंबईच्या फलंदाजांनी टिचून फलंदाजी केली आणि ९ गडी बाद ५३६ धावांचा डोंगर उभारला. या डावात सरफराज खान हिरो ठरला.
सरफराजने पहिल्या डावात मुंबईसाठी दुहेरी शतक झळकावलं आणि संघाची धावसंख्या ५०० पार पोहोचवली. इराणी कप नव्हे तर, रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्याने शतकांचा पाऊस पाडला आहे. मात्र तरीही त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान का मिळत नाहीये? जाणून घ्या.
सरफराज खान सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील रन मशीन म्हणून ओळखला जातोय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. २०२२-२३ मध्ये झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने ३ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं होतं. ही दमदार कामगिरी पाहता त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली होती.
भारतीय संघातील सर्वच खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. सरफराजला बांगलादेश विरुद्धच्या संघात तर स्थान मिळालं, मात्र प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. कारण सलामीला फलंदाजी करत असलेले रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत. त्यानंतर शुभमन गिल फलंदाजीला येतो. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानेही शतक झळकावलं आहे. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येतो. त्यानंतर रिषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनीही अर्धशतकी खेळी करत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
हे स्टार खेळाडू झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनसारखे अष्टपैलू खेळाडू येतात. इथून पुढे गोलंदाजांचा क्रम सुरू होतो. त्यामुळे सरफराज खानला संधी मिळत नाहीये.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.