
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका ही भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधीची रंगीत तालीम होती, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव करण्याच्या दृष्टीने भारतात आला.
मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. इंग्लंडने ही मालिका ३-० ने गमावली. तर भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करुन दाखवलाय. ही मालिका सुरु होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसमोर अनेक प्रश्न होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेतील सर्वात समाधानकारक बाब म्हणजे, भारती संघाची फलंदाजी. जे फलंदाज गेल्या काही मालिकांमध्ये संघर्ष करताना दिसून येत होते. ते फलंदाज या मालिकेत जबाबदारी घेऊन धावा करताना दिसून आले आहेत.
ज्यात कर्णधार रोहितपासून ते विराट कोहलीपर्यंत सर्वच फलंदाजांचा समावेश आहे. दुबईतील खेळपट्ट्या आणि भारतातील खेळपट्या यात फार काही फरक नाही. या खेळपट्ट्यांवर फलंदाजांना मदत मिळते. आता फलंदाज फॉर्ममध्ये परतल्यामुळे हा प्रश्न तर सुटला.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, टॉप ऑर्डरच्या फलंदाजांची फ्लॉप सुरुवात. मात्र इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताच्या टॉप ऑर्डरने चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या सामन्यात रोहितला हवी तशी सुरुवात करुन देता आली नव्हती.
मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. तर शुभमन गिलने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. विराटबद्दल बोलायचं झालं, तर तिसऱ्या सामन्यात तो देखील फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळे टॉप ऑर्डरचाही प्रश्न सुटला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो संघात कमबॅक करु शकलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याने आधीच माघार घेतली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत तो खेळणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह होतं.
अखेर बीसीसीआयने तो खेळणार नसल्याची माहिती दिली. बुमराह बाहेर पडताच हर्षित राणाला संधी मिळाली. राणानेही या संधीचं सोनं केलं. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विकेट्स काढून दिल्या. त्यामुळे बुमराहच्या रिप्लेसमेंटचा प्रश्नही जवळपास सुटला आहे. मात्र तो आता कसा खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारतीय संघाचे सामने दुबईत होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ फिरकी गोलंदाजांना खेळवण्यावर अधिक भर देऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना संधी दिली गेली होती. जर अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांना संधी दिली जाणार असेल, तर कुलदीप किंवा वरुणला संधी दिली जाऊ शकते. तर हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगपैकी दोघांना खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.