आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान काही भारतीय खेळाडू आहेत, ज्यांचा हा शेवटचा टी -२० वर्ल्डकप असू शकतो.
या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. असं म्हटलं जात आहे की, हा विराट कोहली आणि रोहित शर्माचा शेवटचा टी -२० वर्ल्डकप असू शकतो. विराट कोहली ३५ वर्षांचा आहे. तसेच त्याच्या स्ट्राइक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर तो टी -२० क्रिकेटला राम राम करू शकतो.
आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हा रोहितचा देखील शेवटचा टी -२० वर्ल्डकप असू शकतो. रोहित नुकताच ३७ वर्षांचा झाला आहे. त्याच्या टी -२० क्रिकेटमधील फलंदाजीवर आणि फिटनेसवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे त्याचा देखील हा शेवटचा टी -२० वर्ल्डकप असू शकतो. याशिवाय रविंद्र जडेजा देखील ३५ वर्षांचा आहे. तो देखील टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर टी -२० क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. या स्टार खेळाडूंची जागा घेण्यासाठी युवा खेळाडू सज्ज झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.