

इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नईच्या टीमने १०३ रन्सने मोठा विजय नोंदवला. दरम्यान या सामन्यात एक मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. डोक्याला दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याच्या निर्णयावरून हा सामना वादाचा विषय ठरला.
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात संजू सॅमसनच्या शानदार शतकाच्या जोरावर सीएसकेने २०७ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. तर मुंबईच्या टीमला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अवघ्या १०४ रन्सच्या स्कोरवर मुंबईचे शिलेदार माघारी परतले.
मात्र सामन्यादरम्यान एक मोठा गदारोळ झाला. ज्यावेळी मिचेल सँटनर फिल्डींग करताना जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. सुरुवातीला ही खांद्याची दुखापत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र नंतर त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला बदली खेळाडू म्हणून आणण्यात आलं.
दरम्यान मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे चाहते आणि तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले. कारण सँटनरच्या खांद्यावर पट्टी बांधलेली दिसली ज्यामुळे डोक्याच्या दुखापतीबद्दल प्रश्न निर्माण झाला.
दरम्यान वाद वाढल्यानंतर एमआयचे प्रशिक्षक महेल जयवर्धने यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "सँटनर सुरुवातीला डोक्यावर आणि मानेवर पडला त्यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याला तोल सांभाळता येत नसल्याने त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं. टीमने डोक्याला दुखापत झाल्यास बदली खेळाडूची विनंती केली होती. परंतु त्याला मंजुरी देण्याचा अधिकार हा रेफरी आणि अंपायरचा असतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, डोक्याला दुखापत झाल्यास बदली खेळाडूंची नावं आधीच सुचवली जातात. याचा अंतिम निर्णय सामनाधिकारी घेतात. हा पर्याय केवळ तेव्हाच लागू होतो ज्यावेळी एखाद्या खेळाडूला डोक्याला दुखापत झाली असते.
कॅमेरात सँटनरच्या खांद्याच्या दुखापतीचे व्हिज्युअल्स दाखवले. त्यामुळे बदली खेळाडूसाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये विरोधाभास दिसला. त्यामुळे या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. अनेकांनी हा निर्णय नियमांच्या विरोधात असल्याचं सांगितलं.