
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी -२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हे आमंत्रण स्वीकारून भारतीय फलंदाजांनी इंग्लंडचं गोलंदाजी आक्रमण फोडून काढलं. यासह भारतीय संघाने पहिल्याच डावात ३ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वादळी सुरुवात केली. जॉफ्रा आर्चरने टाकलेला पहिलाच चेंडू संजू सॅमसनने बाऊंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवला. त्यानंतर संजू बाद होऊन माघारी परतला.
पण अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी शेवटपर्यंत सुरुच ठेवली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेत अभिषेक शर्माने चौकार - षटकारांचा पाऊस पाडत पावरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारतीय संघाने ६ षटकअखेर ९५ धावा केल्या.
पावरप्लेमध्ये चौकार - षटकारांचा पाऊस पाडत, सर्वात वेगवान सांघिक शतक झळकावण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा फलंदाजी करत असताना भारतीय संघाने अवघ्या ६.३ षटकात सांघिक शतक पूर्ण केलं.
वानखेडे स्टेडियमचा एकही कोना शिल्लक राहिला नसेल, जिथे अभिषेक शर्माने मारलेला चेंडू गेला नसेल. अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. सुरुवातीला त्याने वेगवान अर्धशतक पूर्ण केलं.
त्यानंतर ३७ चेंडूंचा सामना करत वेगवान शतक पूर्ण केलं. हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. यापूर्वी केवळ रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरला सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करता आला आहे. रोहित आणि मिलरने ३५ चेंडूत वेगवान शतक झळकावलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.