WTC Points Table: टीम इंडिया तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? या 2 संघांचे टेन्शन वाढले
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने २८० धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या मैदानावर पार पडला.
या सामन्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. सामन्यातील पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाला .त्यानंतर पुढील २ दिवस एकही चेंडू टाकला गेला नव्हता. शेवटच्या दोन्ही दिवशी भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि बांगलादेशला ७ गडी राखून धूळ चारली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ मजबूत स्थितीत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे. मात्र या विजयासह भारतीय संघ आणखी मजबूत स्थितीत पोहोचला आहे. या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाची सरासरी ७१.७४ इतकी होती. आता ही सरासरी ७४.२४ वर जाऊन पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियाची सरासरी ६२.५ इतकी आहे.
बांगलादेशचं नुकसान
हा सामना गमावणाऱ्या बांगलादेश संघाचं मोठं नुकसान झालं आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशची सरासरी ही ३९.२९ इतकी होती. यासह बांगलादेशचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी होता. तर पराभवानंतर ही सरासरी घसरुन ३४.३७ वर येऊन पोहोचली आहे. या पराभवासह बांगलादेशचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचे सर्व मार्ग जवळजवळ बंद झाले आहेत.
टॉप ३ मध्ये कोण?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेतील टॉप ३ संघांबद्दल बोलायचं तर, भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे आणि श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ यावेळीही फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळताना दिसून येऊ शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.