नवी दिल्ली: आशिया चषक 2022 हंगामातील दुसरा सामना आज 28 ऑगस्ट रोजी होत आहे. हा सामना भारत (Team India) आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला आहे.
या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ 'काळी पट्टी' परिधान करून मैदानात उतरला आहे. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यासाठी टीमने काळी पट्टी लावून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. 'पाकिस्तान क्रिकेट संघ आज आशिया कपमध्ये पहिला सामना भारतीय संघाविरुद्ध (Team India) खेळणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ काळी पट्टी बांधून खेळणार आहे. पाकिस्तानातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हे केले जाणार आहे, अस या निवेदनात म्हटले आहे.
सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील पुराबद्दलही भाष्य केले. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्याने केले. आपल्या देशासाठी हा कठीण काळ असल्याचे बाबर म्हणाला होता.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील बहुतांश भागात भीषण पूरस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील 30 लाखाहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यामध्ये एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही प्रांतातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.