

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळला गेला. हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रंगला. क्लीन स्वीप टाळण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने कमबॅक करत ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हे लक्ष्य फक्त ३८.३ ओव्हरमध्येच पूर्ण केले.
रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली होती. एकीकडे रोहित- विराटच्या निवृत्तीची चर्चा सुरु असताना या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची जाणीव करुन देत चमकदार कामगिरी केली.
विराट कोहली- रोहित शर्मा चमकले
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीसाठी मैदानात उतरलेले कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी ६९ धावांची भागीदारी करत भारताला स्थिर सुरुवात करून दिली. जोश हेजलवूडने शुभमन गिलचा विकेट घेत ही भागीदारी मोडली. सलग दोनदा शून्यावर बाद झालेला किंग कोहलीने सावधगिरी बाळगत १३ व्या बॉलवर खाते उघडले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची शानदार भागीदारी केली.
रोहितने २५ बॉल्समध्ये १३ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या. त्याने त्याच्या वनडे करिअरमधील ३३ वे शतक झळकावले. तर किंग कोहलीने दमदार कमबॅक करत ८१ बॉल्समध्ये सात चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. कोहलीचे हे ७५ वे वनडे अर्धशतक होते. वनडे सामन्यांमध्ये १९ वेळा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. आता, सर्वाधिक १०० धावांच्या भागीदारींच्या बाबतीत फक्त सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली आणि कुमार संगकारा-तिल्लकररत्ने दिलशान या यादीत पुढे आहेत.
तिसऱ्या वनडे सामन्यात मोडले अनेक विक्रम
रोहित हा तिन्ही फॉरमॅटमध्ये पाच किंवा त्याहून अधिक शतके करणारा एकमेव फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित अव्वल स्थानी आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एकूण सहा आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. या सामन्यातील खेळीदरम्यान रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५०० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो फक्त दुसरा फलंदाज आहे. रोहित नंतर विराट कोहलीने सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. कोहलीने ३२ शतकीय खेळी केली.
कर्णधार शुभमन गिल वनडे सीरीजमध्ये फ्लॉप
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. संघाची धुरा युवा खेळाडू शुभमन गिलच्या हातात देण्यात आली होती. गिलच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेतील पहिला सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताचा २ विकेट्सने पराभव केला. क्लीन स्वीप टाळण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. शुभमन गिलने तीन सामन्यात १० (१८) ९(९), २४(२६) फक्त ४३ धावा केल्या तर कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला.ऑस्ट्रलियाने ३ सामन्याची वनडे मालिका २-१ ने जिंकली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.