

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या ०-२ पराभवाची खंत काहीशा प्रमाणात कमी झालीये. मात्र तरीही गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय.
आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी टेस्ट सिरीजमधील पराभवाबाबत गंभीर यांच्यावर मोठं विधान केलंय. शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितलं की, टीमच्या पराभवासाठी एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरणं चुकीचं आहे. टीम इंडियाने गेल्या एका वर्षात दोन वेळा घरच्या मैदानावर टेस्ट सिरीज गमावल्या आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारताला ३-० ने पराभूत केले होते.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना शास्त्री म्हणाले की, टीम हरली की नेहमी कोचवरच बोट ठेवलं जातं. त्यांनी सांगितलं की, जर ते स्वतः प्रशिक्षक असते तर पराभवाची जबाबदारी स्वीकारली असती. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केलीये. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये गंभीर टीमला अजून स्थिरता देऊ शकलेला नाही. त्याच्या कार्यकाळात भारताने २ टेस्ट सिरीज जिंकल्या आहेत, ३ गमावल्या आहेत आणि १ सिरीज बरोबरीत सुटली आहे.
रवि शास्त्री म्हणाले, "लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागते. असं होऊ नये की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता. माझ्याबरोबर असं घडलंय. त्यामुळे मी माझा अनुभव सांगतो. जेव्हा असं घडतं, तेव्हा खेळाडूंनीही आपली चूक मान्य करायला हवी. खेळाडूंमध्ये ही भावना असली पाहिजे की, आम्ही पराभव स्वीकारलाय आणि त्यातून आम्ही अधिक चांगला खेळ करू. जोपर्यंत असं होत नाही, तोपर्यंत गोष्टी पुढे जात नाहीत."
शास्त्री यांनी गंभीर यांना इशारा देखील दिला. त्यांच्या मते, निकाल टीमच्या बाजूने न गेल्यास प्रशिक्षकाची नोकरीही जाऊ शकते. जर कामगिरी खराब राहिली तर तुम्हाला हटवलं जाऊ शकतं. म्हणून संयम आवश्यक आहे."
वनडे सिरीजनंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० सिरीज खेळणार आहे. या सिरीजमधील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू कटकमध्ये पोहोचलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.