
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना गमावल्यानंतर आता शेवटचा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.
त्यामुळे भारतीय संघ आपल्या मजबूत प्लेइ्ंग ११ सह मैदानात उतरण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आकाश दीप शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आकाश दीपने गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. मात्र तो शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून येणार नाहीये. तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याची माहिती भारताचा हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत दिली.
गोलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीपने गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने फॉलोऑन टाळण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने या डावात फलंदाजी करताना ३१ धावांची खेळी केली होती.
आकाश दीपला भारतात खेळताना कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र ऑस्ट्रेलियात तो पहिल्यांदाच खेळतोय. बॉर्डर- गावसकर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले होते. तर मेलबर्नच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याला २ गडी बाद करता आले होते.
आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला चांगली साथ देत होता. मात्र तो आता शेवटचा सामना खेळताना दिसून येणार नाहीये. आता तो बाहेर झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, हर्षित राणाला संघात संधी दिली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.