
उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदानाआधीच बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल यांनी माघार घेतली.
या तीन पक्षांच्या १४ खासदारांच्या गैरहजेरीमुळे ‘नंबर गेम’वर परिणाम होणार आहे.
एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना ४३६ मतांचा पाठिंबा असून विजय निश्चित मानला जातो.
इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३२४ मतांचा पाठिंबा मिळाला आहे.
तीन पक्षांचा पाठिंबा न मिळाल्याने विरोधकांची एकजूट ढासळल्याचे चित्र.
Vice President Election : भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस पुरस्कृत इंडिया आघाडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या रिंगणात आज मुकाबला होणार आहे. सीपी राधाकृष्ण आणि बी सुदर्शन रेड्डी आपलं नशीब आजमावत आहेत. आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. पण त्याआधीच तीन पक्षांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. बीजेडी-बीआरएस-अकाली दल हे मतदानापासून दूर राहणार आहेत. त्यामुळे मतांच्या खेळात या तीन पक्षांमुळे कुणाचा गेम होणार? याची चर्चा राजधानी दिल्लीत सुरू झाली आहे. तिन्ही पक्ष गैरहजर राहिल्याचा फटका कुणाला बसणार? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान करतात. नंबर गेमचा विचार केल्यास एनडीएचे राधाकृष्णन यांचे वर्चस्व दिसून येतेय. पण इंडिया ब्लॉकने बी सुदर्शन यांना पुढे करत एकीचा डाव खेळला आहे. मतदानाआधी बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन पक्षाकडे एकूण १४ खासदार आहेत. याचा परिणाम कुणावर होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलेय.
बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल या तिन्ही पक्षाच्या खासदारांची संख्या १४ आहे. सध्या लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २३९ खासदार आहेत. दोन्ही सभागृहांतील एकूण खासदारांची संख्या ७८१ आहे. विजयासाठी उमेदवाराला किमान ३९१ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल या तिन्ही पक्षांनी मतदानापासून अंतर राखल्यामुळे 'नंबर गेम' परिणाम होईल. यामुळे आता दोन्ही सभागृहांतील खासदारांची संख्या ७६७ वर आली. त्यामुळे विजयासाठी किमान ३८४ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल हे तिन्ही पक्ष विरोधी आहेत. पण मागील ११ वर्षांपासून एनडीए सरकारच्या जवळ राहिलेत. मोदी सरकारच्या प्रत्येक संकटात ते उभे राहिलेत. अकाली दल तर एनडीएचा भाग होता, बीजेडी आणि बीआरएस युतीत नसूनही सरकारला साथ देत होते. २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीतही या पक्षांनी एनडीएच्या जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला होता. आता त्यांनी मतदानापासून अंतर राखल्याचा परिणाम एनडीएच्या विजयाच्या फरकावर होईल.
काँग्रेसने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार देत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचा पाठिंबा मिळवला. पण संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र ठेवण्यात अपयश आले. बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल यांचा विश्वास मिळवता आला नाही. एनडीएला दोन्ही सभागृहांमध्ये एकूण ४२५ खासदारांचा पाठिंबा आहे. वायएसआरसीपीने एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा दिल्याने आता एनडीएला ४३६ खासदारांचे मत मिळत आहेत. आकड्यांनुसार, एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्याकडे ३२४ मते आहेत. त्यामुळे विजयासाठी ११२ मतांचा फरक स्पष्ट दिसत आहेत. ७ अपक्ष खासदारांनी अद्याप कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.