
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या खळबळजनक आरोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. संसदेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. त्यांना जाणूनबुजून बोलू दिलं जात नाही, असं राहुल म्हणाले. खासदार प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राहुल गांधी यांच्या गंभीर आरोपानं संसद भवन परिसरातील वातावरण तापलं होतं. संसदेमध्ये बोलण्याची संधी दिली जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांवर केला. मला बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी लोकसभा अध्यक्षांकडे केली, पण ते निघून गेले. सभागृहाचे कामकाज स्थगित केले. खरं तर त्याची काही आवश्यकता नव्हती, असे राहुल म्हणाले. राहुल यांचा हा व्हिडिओ प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांवरच आरोप केले. संसदेचं कामकाज लोकशाही पद्धतीने चालवले जात नाही. विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलायला दिलं जातं असा एक नियम आहे. पण मी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला बोलू दिलं जात नाही. लोकशाहीत सरकार आणि विरोधक दोघांना विशेष स्थान असतं. मात्र, या सभागृहात विरोधकांना कोणतंही स्थान नाही, असं टीकास्त्र राहुल गांधी यांनी डागलं.
सभागृहाच्या मर्यादेत राहून आचरण असायला हवं, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सूचित केलं होतं. आतापर्यंत वडील-मुलगी, आई-मुलगी आणि पती-पत्नी या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. याच दृष्टीकोनातून सभागृहाचे नियम आणि परंपरांनुसार आचरण असावे अशी अपेक्षा विरोधी पक्षनेत्यांकडून आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले. सभागृह लोकशाही पद्धतीने चालवले जात नाही, असे ते म्हणाले. मला बोलण्याची संधी दिली जात नाही, असंही गांधी म्हणाले. सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या जवळपास ७० खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करत विरोध नोंदवला.
राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक आरोप केले. मला गेल्या सात ते आठ दिवसांपासून बोलण्याची संधी दिली गेली नाही. येथे विरोधकांना काहीही स्थान नाही. फक्त सरकारलाच स्थान आहे. पंतप्रधान कुंभमेळ्यावर बोलतात. मला बेरोजगारीवर बोलायचं आहे, पण परवानगी दिली जात नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेत्याला संसदीय शिष्टाचाराची आठवण करून द्यावी लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. खरं तर काँग्रेसनं आमच्यावर बालिश माणूस लादलाय हे दुर्दैवं आहे, असं भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.