PM Modi Independence Day speech 2026 key highlights : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून सलग १३ व्यांदा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला ध्वजारोहणापूर्वी प्रथमच 'वंदे मातरम्' ची धुन वाजवण्यात आली. त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी अत्यंत ऐतिहासिक क्षण म्हणून केला.
आज प्रत्येक हृदयात 'वंदे मातरम्'ची धून आहे, प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सर्व स्वातंत्र्यसैनिकांना नमन केले.
विकसित भारताचा महासंकल्प (२०४७):
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला आता लहान स्वप्ने पाहून चालणार नाही, तर मोठी स्वप्ने पाहावी लागतील. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील (२०४७ पर्यंत), तेव्हा भारताला एक 'विकसित राष्ट्र' बनवणे हे १४० कोटी देशवासीयांचे मुख्य लक्ष्य आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश जेव्हा विकसित होण्याचा संकल्प करतो, तेव्हा संपूर्ण जगाला भारताकडे वेगळ्या आदराच्या दृष्टिकोनातून पाहावेच लागेल.
'Fragile Five' ते जगातली मजबूत अर्थव्यवस्था:
गेल्या १२ वर्षांतील प्रगतीचा आलेख मांडताना पंतप्रधान म्हणाले की, एकेकाळी जगाने भारताची गणना कमकुवत अर्थव्यवस्थेमध्ये ('Fragile Five') केली होती. पण नागरिकांच्या परिश्रमांमुळे आज भारत जगातील प्रमुख मजबूत अर्थव्यवस्था बनला आहे.
संरक्षण उत्पादन ४ पटीने वाढले, इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती ७ पटीने वाढ झाली. डिजिटल व्यवहार तब्बल १००% ने वाढले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली. आजच्या डिजिटल युगात 'चिप' (Chip) अत्यंत महत्त्वाची आहे. भारताने यात आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले असून ३ मोठे सेमीकंडक्टर प्लांट्स सुरू झाले आहेत. येथून चिप्सची निर्यातही केली जाईल. येत्या ७-८ वर्षांत आणखी ५ ते ८ नवे प्लांट्स उभारले जातील.
'वोकल फॉर लोकल' आणि आत्मनिर्भरता
पंतप्रधानांनी पुन्हा एकदा 'वोकल फॉर लोकल'चा नारा दिला. भारत आता दुसऱ्या देशांवर अवलंबून राहू शकत नाही. प्रत्येक भारतीय आता स्वदेशी उत्पादनांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. २१ व्या शतकातील भारत जुन्या शतकातील कायद्यांच्या भरवशावर चालणार नाही. काळाच्या गरजेनुसार देश चालवण्यासाठी कायदे आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करावेच लागतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्तांच्या पाठीशी संपूर्ण देश:
देशातील विविध भागांत मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले, "या कठीण काळात संपूर्ण देश पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना आत्मनिर्भरता, स्वदेशीचा स्वीकार, कायदेशीर सुधारणा आणि २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनवण्यासाठी मोठ्या संकल्पांची साथ देण्याचे आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.