उत्तर भारताला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक राज्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशात देखील पावसाने दैना उडवली आहे. नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मध्य प्रदेशातील राजगडमध्ये व्हॅन नाल्यात वाहून गेली. सोमवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत ११ प्रवाशांपैकी ९ जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यात ९ प्रवासी मृत्युमुखी पडले. तर २ प्रवासी बचावले. ही घटना पचोर - सारंगपूर रोडवर पडाना गावाजवळ झिरी नाल्याच्या ठिकाणी घडली. या नाल्यावर पुलाचं काम अर्धवट झालं होतं. पुलावरून नाल्याचे पाणी वाहत होते. व्हॅनचालकाच्या ते लक्षात आले नाही. त्यामुळे चालकाने थेट पुलावर गाडी चढवली. नियंत्रण सुटून व्हॅन नाल्यात पडली. सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. त्यात ३ पुरूष , २ महिला, ३ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. इतर प्रवाशांबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच सारंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी हरविंद सिंह घटनास्थळी पोहोचले. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्याला समोरील पूल स्पष्ट दिसत नव्हता, तर त्याने हा धोका पत्करायला नको होता. जर त्याने प्रसंगावधान राखले असते तर ही घटना घडली नसती, असे हरविंद सिंह यांनी सांगितले आहे. या घटनेत ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्सवर फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रूपयांची मदत सरकारतर्फे दिली जाणार आहे. याशिवाय बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.