

देशात एलपीजी गॅसचा तुटवडा?
एलपीजी गॅस पुरेसा आहे तर एजन्सीबाहेर रांगा का?
सरकारच्या उपाययोजना काय?
सध्या जागतिक पातळीवर सुरु असलेली परिस्थिती फार भीषण आहे. इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद्धाचा जगातील सर्व देशांवर परिणाम होत आहे. भारतावरही याचा परिणाम जाणवत आहे. भारतात पेट्रोल डिझेलचा साठा कमी असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अनेकजणांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. अक्षरशः बॉटल, हंडे, कळशी, मोठ्या टाकीतदेखील अनेकजण इंधन नेताना दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा संपला आहे. याचसोबत एलपीजी गॅसदेखील वेळेवर पुरवला जात नाहीये. एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एलपीजी गॅस बुकिंगच्या कालावधीतही बदल केला आहे. एकीकडे ही परिस्थिती दिसत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार देशात एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहे. दरम्यान, जर एलपीजीचा पुरेसा साठा आहे तर गॅस एजन्सीबाहेर एवढ्या रांगा का लागल्या आहेत, नियमात बदल का केले? असा प्रश्न विचारला जात आहे.
अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे होमुर्झची सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गानेच विविध देशांमध्ये व्यापार केला जातो. त्यामुळे एलपीजीची आयात घट झाली आहे. वाढत्या किंमती आणि वितरणाच्या दबावामुळे देशांतर्गत पुरवठ्याला कमी प्राधान्य दिले आहे. फक्त घरगुती गॅस दिले जात आहेत. त्यामुळे गॅस संपल्याच्या अफवा पसरत आहे. परिणामी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशी परिस्थिती पेट्रोलच्याबाबतीतदेखील आहे.
एजन्सीबाहेर गोंधळ
प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य नागरिकांना एलपीजी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. याचसोबत तुटवडा होईल या भीतीने अनेकांना दोनदा गॅस सिलिंडर बुक केले आहेत. अनेकजण एकत्र गॅस बुक करत असल्याने मोबाईल अॅप, वेबसाइटवर दबाव आला आहे परिणामी सर्व्हर डाउन झाला आहे. मागच्या आठवड्यात तर हॉटेल्सला गॅस पुरवणे बंद झाले होते.
आयातीवर अवलंबून राहणे
भारताने गेल्या वर्षी ३१.३ दळलक्ष मेट्रिक टन एलपीजी गॅसचा वापर केला. यामधील ६०-६५ टक्के हा गॅस आयात केला जातो. यामधील ८७ टक्के घरगुती स्वयंपाकघरात वापरला जातो. तर उर्वरित गॅस व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो. या युद्धामुळे भारत एलपीजी गॅससाठी इतर देशांवर किती अवलंबून आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातच वाहतूक करणाऱ्या होमुर्झच्या सामुद्रधुनीत अडथळे येत असल्याने वाहतूक कमी झाली आहे. यामुळे युद्धाच्या पहिल्या दोन आठवड्यात भारतात एलपीजीची आयात घटली. मध्य पूर्वेकडील होणारा पुरवठा ८९,००० टनांपर्यंत कमी झाला आहे.
भाववाढ (LPG Cylinder Price Hike)
देशात एलपीजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात एलपीजीची साठवण क्षमता १.९ दशलक्ष टन आहे. ही फक्त २२ दिवसांसाठी मर्यादित आहे. त्यामुळेच एलपीजी गॅसच्या किंमतीत ६० टक्के तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ११४.५ रुपयांनी वाढ झाली आहे.यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. याचसोबत व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने काळाबाजार करुन हे गॅस विकत घेतले जात आहे. यामुळे खाद्य पदार्थांच्या किंमती वाढवल्या आहेत.
सरकारच्या उपाययोजना
सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहे. रुग्णालये, शाळा आणि घरांना प्राधान्य दिले जात आहे. राज्यांना वाटप वाढवण्यास सांगितले आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्ववत होत आहे. सरकारने एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. देशात एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.