

कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग
काँग्रेसचे ३० आमदार दिल्लीत तळ ठोकून
मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षात आलबेल नसल्याचं दिसत आहे. पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची धुरळा उडाला असताना कर्नाटकात मात्र स्थिर सरकारला हादर बसण्याची शक्यता आहे. कारण नाराज काँग्रेसच्या ३० आमदारांनी दिल्ली गाठली आहे. हे ३० आमदार राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
सरकारमधील फेरबदलासाठी हे आमदार पक्षश्रेष्ठींवर म्हणजेच राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर दबाव आणणार आहेत. त्यामुळे ही एक प्रकारची बंडाळी असल्याची चर्चा आहे. दरम्यान आमदारांनी याला 'बंड' न म्हणता 'सामूहिक नेतृत्वाची' मागणी म्हटले आहे, पण ३० आमदारांचे एकत्र दिल्लीत येणे हे सिद्धरामय्या सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात "मंत्रिपदाचे उमेदवार नवी दिल्लीत जाण्यात काही गैर नाही. मंत्रिमंडळात फेरबदल अजून व्हायचा आहे. पाच राज्यांमधील निवडणुका आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन हे या विलंबाचे कारण असू शकते."
दिल्लीत दाखल झालेल्या आमदारांचे नेतृत्व करणारे बेलूर गोपालकृष्ण आणि अशोक पट्टन यांनी सांगितले की, त्यांची मागणी केवळ मंत्रिमंडळ विस्ताराची आहे. कर्नाटक सरकारमध्ये असे अनेक मंत्री आहेत ज्यांनी तीन, चार किंवा अगदी पाचवेळा मंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे जे ज्येष्ठ आमदार बऱ्याच काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.
या आमदारांची झोळी अजूनही खालीच आहे, त्यामुळे त्यांना संधी दिली पाहिजे, असं आमदारांचे म्हणणं आहे. इंडिया टुडेने आपल्या वृत्तात आमदार बेलूर गोपालकृष्ण यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “जे नेते वारंवार मंत्री होत आहेत, त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी विनंती आम्ही हायकमांडला करणार आहोत.”
दरम्यान या दिल्ली दौऱ्याची पटकथा या वर्षी मार्चमध्ये एका 'डिनर मीटिंग' दरम्यान लिहिली गेली. आमदारांच्या म्हणण्यानुसार, सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होईल, असे म्हटले होते. मात्र जवळपास तीन वर्षे उलटून गेली आहेत आणि कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमुळे दबाव आणण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आमदारांना आता वाटत आहे. दिल्लीला गेलेला आमदारांचा हा गट मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. नाराज ज्येष्ठ नेत्यांना सामावून घेण्यासाठी सुमारे २५ कॅबिनेट पदांमध्ये मोठ्या फेरबदल करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.