
कल्याण बॅनर्जींचा लोकसभेतील तृणमूल काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा
महुआ मोइत्रा व किर्ती आझाद यांच्यासोबतच्या वादामुळे घेतला निर्णय
ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर घोषणा
पश्चिम बंगाल निवडणुकीआधी पक्षात फूट, तृणमूलची डोकेदुखी वाढली
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सोमवारी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा दिला. पक्षातील सहकारी महुआ मोइत्रा यांच्यासोबतचा कलह आणि किर्ती आझाद यांच्याशी झालेल्या वादानंतर बॅनर्जी यांनी पद सोडलंय. पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली तृणमूलच्या खासदारांसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर कल्याण बॅनर्जी यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळाने कल्याण बॅनर्जी हे आपल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतात. त्यांनी याआधीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. राजीनामा दिल्यानंतर कल्याण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा दिला आहे. कारण पक्षाच्या खासदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, असं बैठकीत दीदी (ममता बॅनर्जी) म्हणाल्या होत्या. यासाठी मी जबाबदार आहे आणि म्हणून मी पद सोडण्याचा निर्णय घेतला असं ते म्हणाले.
कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांच्यात वारंवार खटके उडत होते. अलीकडेच बॅनर्जी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून मोइत्रा यांच्यावर टीका केली होती. मोइत्रा यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्याबद्दल ज्या भाषेचा वापर केला, त्यावर आक्षेप घेतला होता. मोइत्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये वैयक्तिक टिप्पणी केली होती. त्यांनी चुकीचे शब्द वापरले होते. एका खासदाराची तुलना आक्षेपार्ह शब्दांत केली होती. ही बाब दुर्दैवी आहे, असे बॅनर्जी म्हणाले.
ज्या लोकांनी उत्तरं देणं अपेक्षित आहे, तिथे अपशब्दांचा वापर केला जात आहे. ते कशा प्रकारचं राजकारण करत आहेत, याचा त्यांनी स्वतःच विचार करायला हवा. एक लोकप्रतिनिधी शिवीगाळ किंवा असभ्य भाषा वापरायला लागतो, त्यावेळी त्यांची ताकद नाही तर असुरक्षितता यातून प्रतिबिंबित होते, असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.
बॅनर्जी म्हणाले की, जर अशा प्रकारची भाषा एखाद्या महिलेबाबत वापरली असती तर देशव्यापी संताप व्यक्त केला गेला असता. पण जेव्हा पुरुषाबद्दल असं बोललं जातं, तेव्हा त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. शिव्या या शिव्याच असतात. अशा प्रकारची टिप्पणी केवळ अभद्रच नाही, तर अस्वीकारार्ह आहे. मोइत्रांना वाटत असेल की घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणजे त्यांचं अपयश झाकलं जाईल किंवा त्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होणार नाहीत, तर त्या स्वतःची फसवणूक करत आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
कल्याण बॅनर्जी यांचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार किर्ती आझाद यांच्याशी वाद झाला होता. त्यामुळं तृणमूल काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता. अशा प्रकारच्या घटनांनी पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. बॅनर्जींच्याही वक्तव्यामुळं याआधीही वाद झाले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच संसदीय समितीच्या बैठकीत काचेची बाटली फोडण्याचं प्रकरणाचाही त्यात समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.