Pragya Singh Thakur : मालेगाव प्रकरणात नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर केलं; प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर निर्दोष
प्रज्ञासिंह ठाकूर यांचा खळबळजनक दावा
नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी प्रचंड दबाव टाकला
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मालेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, असं प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित चार व्यक्तींना अडकवण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं. आरएसएसच्या नेत्यांमध्ये इंद्रेश कुमार यांचं देखील नाव होतं, असा दावा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. निकालानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. हा भगव्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच मला काही दिवस तपास अधिकाऱ्यांनी टॉर्चर केले होते, असंही त्या म्हणाल्या होत्या. आता त्यांनी पुन्हा खळबळजनक दावा केला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी मला राम माधव यांच्यासह अनेक व्यक्तींची नावं घेण्यास सांगितलं होतं. ही नावं घ्यावीत यासाठी मला टॉर्चर करण्यात आलं होतं. मला हॉस्पिटलमध्येही बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले होते, असं त्या म्हणाल्या.
सत्य कधीच लपवता येणार नाही. मी गुजरातमध्ये राहायची. त्यामुळे मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासही सांगितलं होतं. पण मी कुणाचंही नाव घेतलं नाही. कारण ते मला खोटं बोलण्यास सांगत होते, असे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
एटीएसच्या माजी अधिकाऱ्यानंही केला होता दावा
तत्पूर्वी, एटीएसचे माजी अधिकारी महबूब मुजावर यांनी मोहन भागवत यांच्याविषयी दावा केला होता. तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगितले होते. पण मी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. तपास चुकीचे दिशेने नेतानाच त्याला भगवा दहशतवादाचं स्वरुप देण्याचा यामागचा उद्देश होता, असा दावा मुजावर यांनी केला होता.
मालेगाव प्रकरणी ७ जणांची निर्दोष मुक्तता
एनआयएच्या विशेष न्यायालयानं गुरुवारी प्रज्ञासिंह ठाकूर, प्रसाद पुरोहित आणि इतर पाच जणांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर प्रज्ञासिंह यांच्यासह इतरांनी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारवर गंभीर आरोप केले होते. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी स्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्याचा निकाल १७ वर्षांनी लागला. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.