

पश्चिम बंगालचं राजकारण अचानक ढवळून निघालं आहे. राज्यातील सत्तापरिवर्तनामुळं राजकीय समीकरणं बदलू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत गोंधळ झाल्यामुळं फलता विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. या जागेवर २१ मे रोजी फेरमतदान होणार आहे. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं अचानक फेरनिवडणुकीतून माघार घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रचार थांबण्याच्या काही तास आधीच तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.
फलता विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीतून तृणमूल काँग्रेस उमेदवार जहांगीर खान यांनी माघार घेत असल्याचे मंगळवारी दुपारी जाहीर केले. आता मी या निवडणूक प्रक्रियेचा भाग नसेल, असे जहांगीर खान म्हणाले. त्यांनी माघार घेतल्याने भाजप उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जय-पराजयाचा निकाल २१ मे रोजी होणाऱ्या फेरमतदानानंतरच स्पष्ट होईल.
फलता मतदारसंघात जहांगीर खान यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र, आता राज्यात सत्तापरिवर्तन झालं आहे. फलता हा १५ वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता तिथून निवडणूक लढवणाऱ्या जहांगीर खान यांनी माघार घेतली आहे. या ठिकाणी जहांगीर खान आणि भाजप उमेदवार देवांग्शू पांडा यांच्यात मुख्य लढत मानली जात होती.
२९ एप्रिलला फलता मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत गोंधळ झाला होता. त्यामुळं २१ मे रोजी या ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागला आणि राज्यात सत्तापरिवर्तन झालं. या निकालामुळं फलता मतदारसंघाचं समीकरणही बदललं. ममता बॅनर्जी या सत्तेतून बाहेर गेल्या. भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर जहांगीर खान यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. फलतामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही सुवेंदू अधिकारी फलतामध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी भाजप उमेदवार देवांग्शू पांडा यांच्यासाठी मोठी रॅली काढली. जहांगीर खान यांच्यावर टीकास्त्र सोडलं. जहांगीर खान स्वतःला पुष्पा समजतो. आता या पुष्पाची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. फलताच्या मतदारांनी मागील १० वर्षे आपल्या मनाने मतदान केलं नाही. आता यावर्षी न घाबरता मतदान करा आणि भाजप उमेदवाराला एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले होते.
दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा दृष्टिकोनही बदलला आहे. फलतामध्ये पोलिसांनी अलीकडेच जहांगीर खानचा जवळचा कार्यकर्ता आणि फलता पंचायत समिती उपाध्यक्ष सैदूल खान याच्यावर प्राणघातक हल्ला आणि हिंसाचार पसरवल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर सैदूल फरार होते. पोलिसांची करडी नजर त्यांच्यावर होती. तरीही ते प्रचार करत होते. पण त्यांच्यासाठी कोणत्याही बड्या नेत्याने प्रचारसभा घेतली नाही. त्यामुळेच नाराज होऊन त्यांनी फलताचं मैदान सोडलं असं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.