
भारताचे थोर अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारत मातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने त्यांचा सरळसरळ अपमान केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
निगमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारकडून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. एक दशक ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला. त्यांची नीती-धोरणं आजही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांसाठी एक प्रकारचा आधार मानली जातात, असं राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आजपर्यंत सर्व माजी पंतप्रधानांबद्दल आदर व्यक्त करताना त्यांच्या निधनानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार अधिकृत समाधीस्थळांवर करण्यात आले. प्रत्येक नागरिकाला कोणत्याही गैरसोयीशिवाय त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहता यावी हे यामागील कारण आहे. सर्वोच्च सन्मान आणि समाधीस्थळ हा डॉ. मनमोहन सिंग यांचा तर हक्कच आहे. सरकारने या देशाच्या महान पुत्राबद्दल आदर दाखवायला हवा होता, याकडंही राहुल गांधींनी लक्ष वेधलं.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी देशातील सर्व माजी पंतप्रधानांवर राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. संपूर्ण जगभर ख्याती असलेले आणि १० वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार आणि स्मारकासाठी भाजप सरकार जमीन सुद्धा देऊ शकले नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
केंद्र सरकारनं डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं. त्यानंतर भाजपनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस नेत्याची सोशल मीडियावरील पोस्ट ही निंदनीय आणि तितकीच दुर्दैवी आहे, असं भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळानं त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेसला पत्र देखील पाठवलं. डॉ. सिंग यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारायचा असल्याचं त्यात म्हटलं होतं, असं पात्रा यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या नेत्यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या मनमोहन सिंग यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढलं त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी जमीन न दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकाही केली. तसेच मनमोहन सिंग यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.