
भारत-पाकिस्तानमध्ये आज शनिवारी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशातील युद्ध थांबलं आहे. भारताचं पाकिस्तानसोबत शस्त्रसंधीवर एकमत झालं आहे. मात्र, पाणी,व्यापाराबात ठराव कायम असणार आहे. दोन्ही देशात लागू झालेल्या शस्त्रसंधीमुळे भारताला काय फायदा मिळणार, याबाबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे महत्वाची माहिती दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना तात्काळ युद्ध थांबवण्यास सांगितलं. ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये अटी शर्तीवर शस्त्रसंधी लागू झाली आहे. यासाठी ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. यावर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय मध्यस्थीतून भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न सुटणार होता. पाकिस्तानची खऱ्या अर्थाने गरज होती. पाकिस्तान आक्रमक भूमिका घेत होता, आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका घेण्यासाठी पाकिस्तानकडून कृत्य सुरु होतं'.
'मध्यस्थी झाली नसती, तर भारताची रणनीती पाकिस्तानला पुरून उरली असती. त्यामुळे पाकिस्तानला जे साध्य करायचं होतं, ते साध्य झालं. आमची लढाई पाकिस्तानविरोधात नसून दहशतवादाविरोधात आहे. यामुळे भारताच्या हातात कोणत्या गोष्टी हाती आल्या, हे पाहायचं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोन वाक्यात विषय संपवला. त्यानंतर आता उद्या मोठी चर्चा होणार आहे. यात अटी शर्ती महत्वाच्या आहेत. यामुळे एक टप्पा सुरु झाला. यातील बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका केली आहे, असे ते पुढे म्हणाले.
अमेरिकेच्या मध्यस्थीवर भाष्य करताना ढगे म्हणाले, 'अमेरिकेची डबल ढोलकी असते. त्यांची भूमिका संदिग्ध असते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. याबाबतचे वेगवेगळे कंगोरे आहेत. त्यांच्या अटी आणि शर्ती समजल्यावर पुढे जाता येईल. अमेरिकेची दुटप्पी भूमिका आहे. सर्व बाजून पाहणे महत्वाचं आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.