
भारतीय नागरिकत्व मिळण्याआधीच सोनिया गांधींचं मतदार यादीत नाव
भाजपचा खळबळजनक दावा
निवडणूक कायद्याचे उल्लंघन झाल्याचा भाजपचा आरोप
१९८० व १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत नाव नोंद झाल्याचा दावा
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत सुरू असलेला गदारोळ, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला विषय आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केलेला असतानाच, भाजपनं याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर पलटवार केला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या भारताच्या नागरिक होण्याआधी त्यांचं नाव मतदारयादीत होतं, असा दावा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. भारतीय नागरिकत्व घेण्याआधीच त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.
भाजप आयटी सेल प्रमुख मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. सोनिया गांधी यांचे नाव भारताच्या मतदार यादीत जोडणे हे निवडणूक कायद्याचे उल्लंघन आहे. म्हणूनच राहुल गांधी अयोग्य आणि अवैध मतदारांना नियमित करण्याच्या बाजूने आहेत आणि मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणीचा (SIR) विरोध करत आहेत, असंही मालवीय म्हणाले.
सोनिया गांधींचं नाव पहिल्यांचा १९८० च्या मतदारयादीत नोंदवण्यात आलं होतं. भारतीय नागरिक होण्याच्या तीन वर्षे आधीच हे सगळं करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे इटलीचं नागरिकत्व होतं, असाही उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
सोनिया गांधींचं नाव नागरिकत्वाची आवश्यकता पूर्ण न करता दोनदा मतदार यादीत नोंदवण्यात आलं होतं. पहिल्यांदा १९८० मध्ये इटलीच्या नागरिक म्हणून आणि नंतर १९८३ मध्ये कायदेशीररित्या भारताच्या नागरिक होण्याच्या काही महिने आधी नाव मतदारयादीत नोंदवण्यात आलं होतं. राजीव गांधी यांच्याशी लग्न केल्यानंतर १५ वर्षांनी त्यांना भारतीय नागरिकत्व स्वीकारण्यासाठी विलंब का झाला हे आम्ही विचारत नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात मतचोरीचा दावा केला होता. निवडणूक आयोग आणि भाजपनं संगनमत करून मतांची चोरी केल्याचं म्हटलं होतं. त्याविरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. मतांची चोरी होत असलेले आरोप पुराव्यानिशी सादर केले गेले. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. पाच प्रकारे मतांची चोरी केल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. ड्युप्लिकेट मतदार नोंदणी करण्यात आली आहे. बोगस आणि अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर मतदारनोंदणी केली आहे. एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नोंदणी केली गेली आहे. तसेच नव्या मतदारांच्या फॉर्म ६ चा दुरुपयोग करण्यात आला आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.