Bihar Hospital ICU Ward Fire death Toll Update : राजधानी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये लागलेल्या आगीत २१ जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आणखी एक थरारक दुर्घटना घडली आहे. बिहारमधील एका रूग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याशिवाय अनेकजण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रूग्णालयातच उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अधिकृतरित्या ४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितलेय, पण मृताचा आकडा १० असल्याची माहिती वृत्त आहे. मृतदेह लपवल्याचा आरोपही रूग्णालयावर स्थानिकांकडून कऱण्यात येत आहे.
मुझफ्फरपूरमधील खासगी प्रसाद रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, जिल्हाधिकारी सुब्रता कुमार सेन यांनी ४ जणांच्या मृत्यू झाल्याचे सांगितलेय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. २० रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी, एसएसपी यांच्यासह सर्व अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. रुग्णालयाजवळ मोठी गर्दी जमली असून पोलिसांचाह मोठा फौजफाटा घटनास्थळावर तैणात आहे.
मुझफ्फरपूरच्या ब्रह्मपुरा येथील खासगी प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत चार जणांच्या मृत्यूची जिल्हा प्रशासनाने पुष्टी केली आहे. सर्व रुग्ण आठवडाभरापासून आयसीयूमध्ये दाखल होते. या घटनेचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. ही घटना आज पहाटे ३:२० वाजता घडली. घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये १५ हून अधिक रुग्ण दाखल होते. अग्निशमन दलाच्या अंदाजानुसार ही संख्या २५ आहे. इतर जखमींना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये कोणीही मदतनीस उपस्थित नव्हता. रुग्णांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांनी धावपळ केली, पण आग विझवण्यासाठी कोणीही कर्मचारी दिसले नाहीत. संपूर्ण आयसीयू धुराने भरला होता. रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्याने ओरडत होते. पण त्यांचा आवाज ऐकणारं कोणीही नव्हते. रुग्णालयाच्या विविध मजल्यांवरील लोक धावू लागले आणि रुग्णालयाचे कर्मचारीही जीव वाचवण्यासाठी बाहेर धावले. अनेक मृतदेह चुकीच्या ठिकाणी ठेवल्याचा आरोप होत आहे.
एसएसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, रुग्णांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये एफएसएल पथकाला सहभागी करून घेण्यात आले आहे. सखोल तपास केला जाईल. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस तातडीने कारवाई करतील.