

बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थवर महत्त्वपूर्ण भेट.
गेल्या काही दिवसांतील ही जवळपास बारावी भेट असून युतीच्या चर्चांना वेग.
शिवसेना (UBT) आणि मनसेमध्ये जागावाटपावर तिढा निर्माण झाल्याची माहिती.
वरळी, शिवडी, दादर, माहीम आणि भांडुप या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने जागावाटप गुंतागुंतीचे.
Thackeray Brothers Meeting : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही दोन्ही भावांमधील बारावी भेट आहे, यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
५ जुलै रोजी वरळी डोम येथील जाहीर सभेत 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या भेटीगाठी वाढल्याने दोन्ही भाऊ एकत्र येऊन पालिका निवडणूक लढवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीला राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरी वाढत्या भेटींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. प्राथमिक चर्चा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चालू आहेत... त्या जेव्हा अंतिम टप्प्यावर येतील, तेव्हा नक्कीच दोन्ही पक्षाचे प्रमुख म्हणून दोन्ही बंधू बोलतील, असे किल्लेदार म्हणाले. दोन भावांमध्ये होणाऱ्या या भेटी स्वाभाविक असून, सध्या तरी युती किंवा जागावाटपावर चर्चा होत असल्याचे आपल्याला वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही भावांची ही जवळपास बारावी भेट असून काही जागांवर दोन्ही पक्षांचे दावेदार असल्याने या भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मात्र, सर्व चर्चा अजून प्राथमिक स्तरावरच असल्याचे किल्लेदार यांनी म्हटले आहे.
जागा वाटपावरून घोडं अडले ?
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात युतीच्या जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी शिवतीर्थ येथे महत्त्वपूर्ण बैठक होत असल्याचे बोलले जातेय. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही जरी अडून राहिलो तरी दोन भाऊ आता एकत्र आलेले आहेत. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.
ठाकरे गटाने सुरुवातीला प्रत्येक मतदारसंघात दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तर मनसेने काही विभागांमध्ये तीन जागांची मागणी केल्याने चर्चा थांबली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. वरळी, शिवडी, दादर, माहीम आणि भांडुप यांसारख्या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने जागावाटप गुंतागुंतीचे झाले आहे. संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यावर चर्चेची जबाबदारी आहे. या बैठकीतून जागावाटपाचा तिढा सुटून युतीवर शिक्कामोर्तब होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.