बारवी धरण १०० टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो
पहाटे ४ वाजता ११ दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे २५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा २००२ मिमी पावसाची नोंद
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मीरा-भाईंदरसह अनेक भागांसाठी हे धरण महत्त्वाचे
ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बदलापूरजवळील बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज पहाटे ४ वाजता धरणाचे तब्बल ११ दरवाजे उघडण्यात आले. या सर्व दरवाजांतून सध्या सुमारे २५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस झाला आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात तब्बल २००२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला आणि अखेर बारवी धरण ओव्हरफ्लो झाले.
बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा-भाईंदर यांसह मोठ्या औद्योगिक क्षेत्राला याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरण पूर्ण भरल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी वर्षातील पाणीटंचाईची चिंता बऱ्याच अंशी दूर झाली आहे.
दरम्यान, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.