संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवलीतील मनसे कार्यालयात भाजपमधून पुन्हा मनसेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी मोठे राजकीय विधान केले आहे. "पुढच्या अडीच वर्षांत मी आमदार होणार, १०० टक्के" असा ठाम दावा करत त्यांनी कल्याण ग्रामीणमधील SIR मतदार यादी, EVM, निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका केली. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील तब्बल दोन लाख ५५ हजार मतदारांची नावे वगळल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणत्याही वादात न पडण्याची भूमिका मनसेने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील मनसे कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना मनसे नेते राजू पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत मोठा दावा केला. पुढील अडीच वर्षांत आपण पुन्हा आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र SIR प्रक्रियेनंतर सुमारे दोन लाख ५५ हजार मतदारांची नावे यादीतून कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
यामध्ये मृत, स्थलांतरित आणि ठावठिकाणा नसलेल्या मतदारांची नावे असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी EVM, निवडणूक आयोग आणि भाजपवरही टीकेची झोड उठवली. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत भाजप हिंदुत्व आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही वादात किंवा भांडणात न पडण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे सांगत, विरोधकांकडून मनसेला जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राजू पाटील यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.