

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray) हे अखेर जवळपास दोन दशकांनी एकत्र आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष युती करणार असून, याबाबतची घोषणा उद्या, बुधवारी (२४ डिसेंबर) होणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणुका लढणार आहेत.
राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, असं दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटत होते. दोन दशकांच्या कालावधीत यासाठी अनेक प्रयत्न झाले होते. पण ऐनवेळी टाळी कोण देणार या प्रतीक्षेत चर्चा फिस्कटायची आणि पुन्हा हा ठाकरे बंधूंचा मुद्दा बाजूला राहायचा. मध्यंतरी बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. दोन दशकांनी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. पण यापुढं काय? ठाकरे बंधू राजकारणाच्या व्यासपीठावर एकत्र येतील का? निवडणुका एकत्रित लढतील काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळातच नव्हे तर, ज्यांना राजकारण कळतं, त्या गाव-पाड्यांतील लोकांनाही पडला होता. या प्रश्नाचं उत्तर अखेर सर्वांना मिळालं आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार आणि निवडणुकाही एकत्रित लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मतदान झालं आणि निकालही जाहीर झाले. या निवडणूक निकालांनंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, प्रलंबित महापालिका निवडणुकांच्या घोषणा झाल्या आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला वेग आला. अनेक चर्चेच्या फेऱ्या, जागावाटपाचा तिढा असे अनेक अडथळे पार झाले आणि ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांची युती होणार यावर शिक्कामोर्तब झाले. उद्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास ठाकरे बंधू एकत्र येत असून, युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत यांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली.
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. यावर विरोधी पक्ष अर्थात महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यांकडून टीकाही झाली होती. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे एकत्र येत आहेत, अशी टोलेबाजी या नेत्यांकडून केली जात होती. पण संपूर्ण राज्यातच युती व्हावी अशी इच्छा ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी अनेकदा व्यक्त केली होती. ही इच्छा बऱ्यापैकी पूर्ण झालेली दिसून येत आहे. कारण दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता उर्वरित महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.