पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा केवळ १२.५२ टक्क्यांवर
गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात ३५ टक्क्यांहून अधिक घट
आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता
राज्यात मान्सून दाखल झाला आणि एकच आनंदच वातावरण निर्माण झालं. मात्र गेल्या ४ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आजपासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मात्र जून महिना संपत आला तरी पुणे जिल्ह्यात अपेक्षित पावसाची जोरदार हजेरी लागलेली नाही. मान्सूनने सुरुवातीला काही भागांत समाधानकारक पाऊस दिला असला, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. विशेषतः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे शहराचा मुख्य पाणीपुरवठा खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांवर अवलंबून आहे. मात्र, या चारही धरणांतील सध्याचा एकूण पाणीसाठा केवळ ३.६५ टीएमसी इतका असून तो एकूण क्षमतेच्या अवघ्या १२.५२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये तब्बल ४८.१७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या तुलनेत पाणीसाठ्यात सुमारे ३५ टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे चित्र आहे. आकडेवारी पाहता खडकवासला धरणात १३.९५ टक्के, पानशेत धरणात १७.४४ टक्के आणि वरसगाव धरणात ११.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर टेमघर धरणातील पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. ही परिस्थिती प्रशासनासह नागरिकांसाठीही चिंतेची बाब मानली जात आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यासच पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पाणीसाठ्याची सद्यस्थिती लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगामी जुलै महिन्यात मान्सून सक्रिय होऊन धरणांमध्ये मुबलक पाणी जमा होईल, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत. सध्या मात्र सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून वरुणराजा कधी कृपादृष्टी करणार याची प्रतीक्षा कायम आहे.