नागपूरमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर मोठा राडा झाला. नागपूरमध्ये दोन गट आमने-सामने येत दगडफेक, जाळपोळ करण्यात आले. या हिंसाचारामध्ये अनेक पोलिस जखमी झाले. नागपूर हिंसाचारावरून आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपूर हिंसाचारावरून थेट महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी हा नवीन दंगल पॅटर्न आणला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
'ज्यात अधिवेशन सुरू असताना ही लोकं कोण आहेत दंगे पसरवत आहेत. ही विश्व हिंदू परिषदेची लोकं आहेत किंवा संघाची लोक आहेत त्यांचे चेहरे कळत आहेत. फडणवीसांना ती लोकं माहीत असतील. हिंदूंना भडकविण्यासाठी हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. हा नवीन पॅटर्न आता सुरू आहे. महाराष्ट्रात हा नवीन दंगल पॅटर्न तयार झालेला आहे. अशा दंगली पेटून २०२९ च्या निवडणुकींना सामोरे जायचं असा हा दंगल पॅटर्न आहे.', अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ही दंगल आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पाहिली असती तर दंगलखोर कुठल्या जातीचा, कुठल्या पक्षाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावले उचलतील . हे दंगल पेटवणारे कोण आहेत आणि दंगल का पेटवली जात आहे. उद्या गुढीपाडव्याला देखील दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील. औरंगजेबाची ढाल करून काही लोक महाराष्ट्रात दंगल उसळत आहेत. सरकार तुमचं आहे तर दंगली कशाला भडकवत आहात.', असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला केला आहे.
नागपूर हिंसाचारावरून संजय राऊत यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. 'मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कुदळ फावडा घेऊन जावं आणि लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं ते मेमोरियल आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करायचं. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन दंगी पेटवत आहेत. तर हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसंच, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे अधिवेशनात अनेक प्रश्न दाबण्यासाठी हे औरंगजेबाचे प्रकरण बाहेर काढले आहे. जयकुमार रावल यांनी को-ऑपरेटिव बँकेमध्ये आपल्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपये दिले. गुजरातमधील नातेवाईकांना महाराष्ट्रातील को-ऑपरेटिव्ह बँकेतील पैसे देण्यात आले. हा मनी लॉन्ड्रीचा प्रकार आहे. हा एसआयटीच्या अहवालातील आरोपी क्रमांक ३ जयकुमार रावल आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने ती एसआयटी दाबण्यात आली. फडणवीसांनी अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.