मुंबईकरांना दिलासा
पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये 13,24,585 दशलक्ष लिटर पाणीसाठा
तलाव 91.52 टक्के भरले
यंदाचा साठा गेल्या वर्षीपेक्षा अधिक
मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार, सातही तलावांमध्ये एकूण 13,24,585 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून, तो एकूण उपयुक्त साठवण क्षमतेच्या 91.52 टक्के इतका आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये 12,95,728 दशलक्ष लिटर म्हणजेच 89.52 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली आहे. मात्र, 2024 मध्ये याच काळात 13,48,606 दशलक्ष लिटर म्हणजे 93.18 टक्के पाणीसाठा होता. विहार, तुळशी आणि मोडक सागर तलाव 100 टक्के भरले आहेत.
तानसा तलावात 99.26 टक्के, मध्य वैतरणामध्ये 94.69 टक्के, भातसा तलावात 88.94 टक्के, तर अप्पर वैतरणामध्ये 82.32 टक्के पाणीसाठा आहे. शहराचा सर्वात मोठा जलसाठा असलेल्या भातसा तलावात 6,43,492 दशलक्ष लिटर पाणी आहे. गेल्या 24 तासांत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस झाला.
मध्य वैतरणा येथे सर्वाधिक 31 मिमी पावसाची नोंद झाली. मोडक सागर येथे 29 मिमी, तुळशी 30 मिमी, अप्पर वैतरणा 16 मिमी आणि तानसा येथे 18 मिमी पाऊस झाला. विहार तलाव 7 जुलैपासून ओसंडून वाहत आहे. दरम्यान, अप्पर वैतरणामधून पाण्याचा विसर्ग 6 जुलैपासून बंद आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्याचा साठा दिलासादायक मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.