
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा ते कल्याणदरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. कसाऱ्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कसारा ते कल्याणदरम्यान एकही लोकल धावत नाही. तर कल्याण ते सीएसटीदरम्यान लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या ६ लोकल आणि एक्स्प्रेस रखडल्या आहेत. या सर्व लोकल आणि एक्स्प्रेस एकापाठोपाठ उभ्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या टिटवाळाजवळील खडवली रेल्वे स्थानकाजवळ अज्ञातानी रुळालगत असलेल्या सिग्नलच्या वायर तोडल्या. काल मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सिग्नलच्या वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण ते कसारा दरम्यान दोन्ही मार्गावर एकही लोकल धावत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. मुंबईच्या दिशेला कामावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे कल्याण ते कसारादरम्यानच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सिग्नलच्या तुटलेल्या वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास खडवलीहून सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. खडवलीकडे जाणारी वाहतूक अद्यापही विस्कळीतच आहे. सिग्नलच्या वायर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.