सीएसएमटी ते खोपोली मार्गावर १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्याची तयारी
३१ ऑगस्टपर्यंत ५० पेक्षा जास्त स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम पूर्ण होणार
वाहतूक क्षमतेत २५% वाढ होण्याची अपेक्षा
ओव्हरहेड वायर, सिग्नल पोल आणि ट्रॅक बदलाची कामे वेगाने सुरू
मध्य रेल्वेने वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मुंबईतील लोकल सेवा अधिक सोयीस्कर आणि सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते खोपोलीदरम्यान १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, या संदर्भातील कामे वेगाने सुरू आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, ३१ ऑगस्ट ही अंतर्गत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीएसएमटी-कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरील दहा स्टेशनांवर एकूण २६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार आहे. तसेच, कल्याण - कसारा आणि खोपोलीदरम्यानच्या २४ स्थानकांवरही प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाहतूक क्षमतेत तब्बल २५ टक्क्यांची वाढ होणार असून, प्रवाशांना गर्दीच्या वेळीही तुलनेने आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
गेल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सतीश कुमार यांनी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याचे आणि १५ डब्यांच्या सेवेला चालना देण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनेनंतर कामांना गती मिळाली आहे.
रेल्वे प्रशासनानुसार, जलद मार्गावरील विक्रोळी, कळवा, मुंब्रा आणि दिवा ही स्थानके १५ डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी सज्ज केली जात आहेत. तर धीम्या मार्गावरील शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, भिवपुरी, कर्जत, पळसदरी, डोलावली, लवजी आणि खोपोली या स्थानकांवरही प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे.
सध्या १५ डब्यांच्या लोकल गाड्या केवळ सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवर थांबतात. त्यामुळे इतर मार्गांवरील प्रवाशांना याचा लाभ मिळत नव्हता. प्लॅटफॉर्म विस्तारानंतर ही सेवा अधिक स्थानकांपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या प्रवासात लक्षणीय बदल होणार आहे.
या प्रकल्पासाठी ओव्हरहेड वायर स्थलांतर, सिग्नल पोल हलवणे, ट्रॅक बदल, आणि प्लॅटफॉर्म विस्तारासाठी आवश्यक जागा निर्मितीची कामे केली जात आहेत. मुंब्रा आणि विक्रोळी स्थानकांवरील ओएचई कामांसाठी प्रत्येकी ७५ ते ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काम करताना सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे कल्याण, कसारा आणि खोपोली मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या वेळी होणारी गुदमरून जाणारी परिस्थिती कमी होईल, तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील हा बदल प्रवाशांच्या सोयीसाठी ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.