टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा पुढे ढकलली
नव्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी
परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता
राज्यात नीट पेपर फुटी प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ठाण्यात शिक्षकांसाठी घेतली जाणारी TET परीक्षेचा पेपर फुटला. याप्रकरणात दिल्ली कनेक्शन समोर आले असून ३ जणांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर मात्र TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही परीक्षा आता नव्याने सप्टेंबर पर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यावेळेस कोणतीही हलगर्जी न करता परीक्षा पार पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
TET पेपर फुटी प्रकरणानंतर नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांची पडताळणी करणे तसेच सुरक्षा निकषांची पूर्तता करणे या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. राज्यातील सुमारे ६ लाख उमेदवारांनी टीईटीसाठी अर्ज केले आहेत. परीक्षा पुढे ढकलली गेल्यास या उमेदवारांची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे.
अनेक उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून परीक्षेच्या तयारीत व्यस्त असून, पुन्हा होणाऱ्या परीक्षेची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र ही परीक्षा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा पर्यायही शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे.
शिक्षण विभागाकडून अद्याप अधिकृतपणे नव्या परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी लागणारा कालावधी आणि सुरक्षा उपाययोजनांचा विचार करता परीक्षा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता उमेदवारांचे लक्ष परीक्षेच्या तारखांकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.