चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस
अंधेरी, साकीनाका, बीकेसी, मुलुंड आणि बोरिवलीसह अनेक भागांत दमदार सरी
मुंबई आणि कोकणासाठी यलो अलर्ट, तर अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी
पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे
Maharashtra Weather Update Today News गेल्या चार दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. शहरासह उपनगरांतील अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यरात्रीपासून अंधेरी, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), मुलुंड, बोरिवली, कांदिवली आणि इतर उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. आज सकाळीही आकाश ढगाळ असून अनेक भागांत हलक्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यभर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील लोणावळा येथे गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल काहीशी मंदावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातही पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भिवंडी शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले होते. यामुळे शहरातील आमपाडा व खंडू पाडा परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. प्रभूआळी परिसरात पावसामुळे एका इमारतीचे सुरक्षा भिंत कोसळली सुदैवाने कोणीही जखमी नाही. तर शांतिनगर परिसरात घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची घटना घडली आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे पाण्याचा निचरा झाला असून भिवंडी महापालिकेने केलेल्या नालेसफाईची अक्षरशः पोलखोल झालेली आहे. काल रात्री झालेल्या काही तासांच्या पावसातच रस्त्यांवर पाणी आणि घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.