Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं
Summary -
सामना अग्रलेखातून रेव्ह पार्टी प्रकरणावरून भाजपवर निशाणा
रेव्ह पार्टीचा सूत्रधार गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप.
खडसे यांच्या जावयाच्या अटकेमागे महाजन असल्याचा आरोप.
आर्यन खान आणि नवाब मलिक प्रकरणांशी केली तुलना.
पुण्यातील खराडीमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीच हा कट रचला असल्याचा आरोप केला जात आहे. अशामध्ये सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी देखील गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. 'भाजप हीच एक रेव्ह पार्टी आहे. या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत.', अशी टीका महाजनांवर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसंच खडसेंना मंत्रिपद का सोडावं लागले होते हा मुद्दा देखील यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण वगैरे लोकांना नैतिकतेचे वावडे आहे आणि पक्ष ‘हाऊसफुल्ल’ करण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. स्वतः खडसे यांना मंत्रिमंडळातून नैतिकतेच्या मुद्द्यावरून जावे लागले. भोसरीचे जमीन प्रकरण त्यासाठी उभे केले गेले, पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज जे लोक बसले आहेत, त्यांच्या बाबतीत काय मोठी नैतिकता ओसंडून वाहत आहे? भाजपमध्ये ज्या प्रकारचे लोक आले त्यांचे उद्योग पाहता महाराष्ट्राच्या नैतिकतेची ऐशी की तैशीच झाली आहे. गिरीश महाजन यांच्या कारनाम्यांविषयी काय श्री. फडणवीस यांना माहीत नाही? पोलिसांचा मस्तवाल वापर करून त्यांचे राजकारण सुरू आहे.'
गिरीश महाजन यांनीच खडसेंच्या जावयाला अडकवल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'हाताशी पोलिस आहे म्हणून महाजनसारख्यांचे राजकारण टिकले आहे. खडसे यांच्या जावयास रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. त्याच पद्धतीने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमली पदार्थांचा व्यापार करतो म्हणून अटक केली आणि अनेक महिने तुरुंगात टाकले, पण ज्यास फडणवीसांचे पोलिस आणि ईडीवाले ‘अमली पदार्थ’ समजत होते, तो सुगंधी तंबाखू होता व त्यावर भारतात बंदी नाही हे उघड झाले. मलिक यांचे जावई नंतर सुटले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन यालाही अशाच प्रकरणात अडकवून मोठा गाजावाजा केला. हे सर्व प्रकरण खोटे, बनावट ठरले. फडणवीस यांच्या राज्यातील पोलीस व तपास यंत्रणांचे हे प्रताप डोळ्यांसमोर आहेत.'
रेव्ह पार्टीचे खरे सुत्रधार गिरीश महाजन असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. गिरीश महाजनांमुळे मुख्यमंत्री गोत्यात येऊ शकतात असे देखील त्यात म्हटले आहे. 'भारतीय गुंडा, बलात्कारी पार्टीला नैतिकतेची उबळ आली की, विरोधकांवर धाडी टाकायच्या व आपला नैतिकतेचा कंडू शमवायचा. ज्या प्रकारचे गुंड, भ्रष्ट, अनैतिक लोक भाजपमध्ये घेतले जात आहेत ते पाहता भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली आहे आणि या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस गोत्यात आणू शकतो. सत्तेचे, पैशांचे, अनैतिकतेचे बेफाम वारे या माणसाच्या डोक्यात शिरले आहे. हे घातक आहे.', असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.