संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमधील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित चारपदरी उड्डाणपुलाचे काम होणार आहे. त्या कामासाठी अतिक्रमण हटवले जात आहे. मात्र त्यावरून वाद सुरू झाला आहे. केडीएमसी मार्फत करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर असून या प्रकरणात प्रशासनाने योग्य न्याय द्यावा, अशी मागणी बुद्धभूमी फाउंडेशनचे संचालक गौतम रत्न थेरो भंतेजी यांनी केली आहे.
गौतम रत्न थेरो भंतेजी यांनी सांगितले की, संबंधित भूमी ही सार्वजनिक कामांसाठी सुरक्षित ठेवण्यात आली असून १९८०-८१ सालापासून या जागेच्या वापर आणि वहिवाटीच्या विविध शासकीय नोंदी उपलब्ध आहेत. मात्र, महापालिकेने चुकीच्या पद्धतीने टीडीआर व्यवहार करून ही जागा आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात मागासवर्गीय आयोगाने सुनावणी घेत आदेशही पारित केल्याचा दावा बुद्धभूमी फाउंडेशनकडून करण्यात आला आहे.
फाउंडेशनच्या वतीने जागेच्या मोबदल्यासाठी आर्थिक भरपाई न स्वीकारता त्या ठिकाणी विपश्यना केंद्र, शाळा आणि रुग्णालय उभारून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई केल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे.
या कारवाईदरम्यान परिसरातील वास्तू, मूर्ती तसेच सुमारे ४२ झाडांची बेकायदेशीररीत्या नासधूस करण्यात आल्याचा गंभीर आरोपही गौतम रत्न थेरो भंतेजी यांनी केला आहे. तर यापूर्वी केडीएमसीनी कारवाई कायदेशीर असल्याचे सांगितले आहे.या प्रकरणामुळे कल्याण परिसरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून प्रशासन आणि बुद्धभूमी फाउंडेशन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.