
अक्षय बडवे, साम टिव्ही
पुणे : अकरावी प्रवेशाच्या संदर्भात रोज नवनवीन गोष्टी समोर येतायत. कधी ऑनलाइन प्रवेशाची तारीख बदलते तर कधी प्रवेश प्रक्रियेत बदल होताना दिसतो. अशातच आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आता एससी, एसटी, ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अल्पसंख्यांक कोट्याला कुठलाही धक्का लावण्यात येणार नाही सुधारित परिपत्रकात शासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. नेमका हा निर्णय काय आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांवर आणि संस्थाचालकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो.
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एससी, एसटी आणि ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे अल्पसंख्याक संस्थांच्या ५० टक्के कोट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानुसार, काही संस्थांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान देण्याचा निर्णयही घेतला होता. पण या प्रकरणी वाद उत्पन्न होताच मंत्रालयाने सुधारित परिपत्रक जारी करून अल्पसंख्याक कोट्याला कोणताही धक्का लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये ११वी प्रवेशाच्या वेळी एससी, एसटी आणि ओबीसी कोटा जोडण्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला होता. यावर काही अल्पसंख्याक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अल्पसंख्याक संस्था व महाविद्यालयात ५० टक्के जागा आरक्षित आहेत. त्यात एससी, एसटी व ओबीसी कोटा जोडल्यास हा कोटा ८६ टक्क्यांपर्यंत जाईल. परिणामी खुल्या प्रवर्गातील जागांचा टक्का कमी होईल, असा त्यांचा आरोप होता. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एका सुधारित आदेश काढून या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. शासनाच्या निर्णयाबाबत क्षण तज्ञांनी सुद्धा त्यांचं मत मांडलं आहे.
शासनाने जारी केलेल्या सुधारित आदेशात स्पष्ट उल्लेख केला आहे की या निर्णयामुळे अल्पसंख्याक आरक्षणाला कुठला ही धक्का लागू दिला जाणार नाही. सरकारने आपल्या सुधारित परिपत्रकात म्हटले आहे की, अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा राखीव असतात. या कोट्यातील जागा शाळा व्यवस्थापनास ३ फेऱ्यापर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असते. नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करता येत नाही. ३ फेऱ्यानंतर या कोट्यातील रिक्त राहणाऱ्या जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करता येतात.
पण आता उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ अल्पसंख्याक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील ५० टक्के जागांपैकी रिक्त राहणाऱ्या जागा पहिल्या फेरीनंतरच सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. परंतु, दुसऱ्या फेरीवेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील. त्यानंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असणार आहे.
या निर्णयाचे काही पालकांनी स्वागत केलंय, तर काही जणांनी हे प्रवेश खुल्या प्रवर्गाला म्हणजेच ओपनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मिळावं असं म्हणलं आहे. ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक कोट्यातील ५० टक्के जागांपैकी जागा प्रत्यार्पित करण्यासाठी कुठल्याप्रकारे बंधन हे अल्पसंख्यांक संस्था महाविद्यालयावर नसणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे ऐच्छिक असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.