संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण ग्रामीण परिसरातील देसाई खाडी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून खाडीत सर्वत्र जलपर्णी पसरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे खाडीतील जैवविविधतेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील अनेक गृहसंकुलांमधून सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडी आणि नदी पात्रात सोडले जात आहे. यामुळे पाण्याची गुणवत्ता घसरली असून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
परिणामी जलस्रोतांचा नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. देसाई खाडीला मिळणाऱ्या नद्यांची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. मलंगगडाच्या पायथ्यापासून उगम पावणाऱ्या वालधुनी आणि मोथली या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. वालधुनी नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर मार्गे वाहत येऊन कल्याण खाडीला मिळते, तर मोथली नदी शिरडोण, वडवली, न्हारेन परिसरातून वाहत देसाई खाडीला येऊन मिळते. या दोन्ही नद्यांमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे त्या नाल्यासारख्या बनल्या असून नदीपात्रात सर्वत्र जलपर्णी पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक जागरूक नागरिक महेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, परिसरातील मोठ्या गृहसंकुलांकडून सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी आणि खाडीत सोडले जात आहे. या प्रकरणी ते राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही पर्यावरणप्रेमींनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची दखल घेतली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशी करण्यात आली असून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.एकीकडे जलस्रोतांचे वाढते प्रदूषण आणि दुसरीकडे प्रशासनाची कारवाईची प्रतीक्षा या दोन्हींच्या कात्रीत सापडलेल्या देसाई खाडीचे भवितव्य आता प्रशासनाच्या पुढील पावलांवर अवलंबून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.